होळी वर मराठीत निबंध

 होळी 

होळी हा हिंदूंचा फार प्राचीन काळापासूनचा सण आहे. संपूर्ण भारतभर होळीचा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो.फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण असतो.या सणाला मराठी भाषेत शिमगा किंवा होळी पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी धुळवड आणि रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रितरीत्या साजरी केली जातात. फाल्गुनी पौर्णिमेपासून दोन, तीन किंवा पंचमी पर्यंत म्हणजेच पाच दिवस सुद्धा होळीचा सण अतिशय मजेमजेत साजरा होतो.

            एकमेकाला गुलाल लावून, रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे,यातून बंधू भाव वाढतो आणि समाजातील विविध प्रकारची विषमता असूनही मानवतेला त्याचा फायदा होता.


    गोवऱ्या, एरंड, ऊसाचे  वाढे,  केळीचे खुंट, गवत इत्यादी वस्तू वापरून  होळी तयार केली जाते. होळीमध्ये आपल्याला नको असलेल्या गोष्टी सुद्धा टाकतात. होळीमध्ये वाईट गोष्टींचे व विचारांचे  दहन करायचे असते. खोबऱ्याचे तुकडे यांची माळ होळीला अर्पण करतात.नारळ सुद्धा अर्पण करतात. मग गावातील एखाद्या आदरणीय व्यक्तीकडून तसेच महिलांकडून होळीची पूजा केली जाते.होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. मग होळी पेटवली जाते. होळी पेटली की लोक बोंबा मारतात.होळी रे होळी, पुरणाची पोळी अशा बोंबा  ठोकल्याने खूप मजा येते.


      छोट्या गावांमध्ये संपूर्ण गाव मिळून एकच होळी तयार करतात. मंदिरासमोर गोलाकार सारवले जाते आणि मध्यभागी एक छोटा खोल खड्डा घेऊन त्यामध्ये एरंड पुरले जाते. याशिवाय उसाचे वाढे त्याबरोबर असते. बाजूने गोवऱ्या  लावतात. पाचट लावतात आणि मग होळी तयार होते. गावाकडे शहरापेक्षा होळीची मजा जास्त येते. कारण खेड्यात होळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मुबलक प्रमाणात भेटतात. लोक होळीसाठी आवर्जून वेळ काढतात. कारण होळीच्या सणामुळे आपला सर्व शीनभाग जाणार आहे हे त्यांना पूर्ण माहीत असते.


     होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. या दिवशी होळी भोवती पाण्याचा फेर घातला जातो. येता जाता लोक एकमेकांवर पाणी टाकतात. हे सारे गंमतीने असते. मग त्याचा खेळ होतो. विविध रंगांचा वापर केला जातो आणि चांगले  कपडे घातलेले लोक एकमेकावर रंग फवारल्यामुळे रंगीबेरंगी दिसायला सुरुवात होते.होळीचा हा सण पाच दिवस चालतो. पाचवा दिवस म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीच्या दिवशी जास्तीत जास्त रंगांचा वापर करून एकमेकांना रंग लावला जातो उडवला स्वतः जातो.


   होळीच्या सणामागे भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा आहे. त्यावेळी राक्षस राजा हिरण्यकश्यपू चे राज्य होते आणि सर्वत्र राक्षशी वृत्तीने हिरण्यकश्यपूने सर्वसामान्यांचे जीवन दुःखी करुन टाकले होते. हिरण्यकश्यपुची बायको कयाधू हिला एक अतिशय गुणवान मुलगा होता. तो राक्षसी वृत्तीचा नसून देव गुणी होता.


भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता. भक्त प्रल्हादाचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू हा विष्णूला मानत नव्हता. देव आणि राक्षसांचे  कधीच पटत नसायचे.विष्णूचे नाव जरी घेतले तरी तो प्रजेला शिक्षा करीत असे. मात्र स्वतःचा मुलगाच सारखा नारायण नारायण करीत राहिल्यामुळे प्रल्हादाचा त्याला प्रचंड राग आला आणि प्रकारे प्रल्हाद नाश करण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला. मात्र तो नष्ट होऊ शकला नाही.  हिरण्यकश्यपू चे सर्व प्रयत्न  व्यर्थ गेले  परंतु  प्रल्हादाचे रक्षण  भगवान विष्णूने केले.  हिरण्यकश्यपूच्या बहिणीला म्हणजेच होलिकेला एक वरदान प्राप्त होते. ते म्हणजे तिला अग्नी जाळू शकत नव्हता. त्यामुळे होलिकेने सांगितले कि मी प्रल्हादाला एका झोपडीत घेऊन बसते. आणि ती झोपडी तुम्ही पेटवून द्या.मला काही होणार नाही आणि प्रल्हाद मरून जाईल.


परंतु असे काही होत नाही. होलिका जळून जाते. म्हणजेच वाईट विचार जळून जातो. चांगला विचार करणारा प्रल्हाद जिवंत राहतो.


  तात्पर्य असे की, वाईट विचारांची होळी होते आणि चांगल्या विचारांचा नेहमी विजय होत असतो. होळीच्या निमित्ताने आपल्या मधील नकारात्मक आणि कुरूप विचार वाईट विचार नष्ट करून म्हणजेच त्यांना जाळून सुंदर विचार सकारात्मक विचार आपल्यामध्ये वाढवायचे आहेत. अशी ही होळी खूप सुंदर अशा पद्धतीने आपण साजरी करून तिचा आनंद लुटला पाहिजे.


अलीकडे होळी खेळताना रासायनिक रंगांचा प्रचंड वापर होताना दिसतो. रासायनिक रंग अतिशय धोकादायक असतात. रासायनिक रंगामुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. पर्यावरणाची सुद्धा  हानी होत आहे  मानवी जीवनाबरोबर   इतर प्राण्यांचे जीवन सुद्धा  धोक्यात येत आहे. पाण्याचा प्रचंड वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे.  त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते आणि पाणी वाचवा या मोहिमेला खीळ बसते. म्हणून पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी आपण पर्यावरणाला अनुकूल अशाप्रकारे होळी साजरी करूया. पर्यावरण पूरक होळी ही आजच्या काळाची अतिशय महत्त्वाची गरज होऊन बसली आहे. पर्यावरणाचा विचार करता मानवजातीला हानिकारक अशा गोष्टी त्याचप्रमाणे सजीव सृष्टी ला सुद्धा आणि कारक अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.  म्हणून मला आपणास सर्वांना विनंती करावी वाटते  की,  माझ्या भावांनो आणि भगिनींनो,  आपण  पर्यावरणाला  धोका  न पोहोचवता  सण  साजरे करण्यासाठी  प्राधान्य  देवून  पर्यावरणाचे  मित्र  बनुया  आणि  पुढील पिढ्यांसाठी  चांगले पर्यावरण  मागे ठेवूया. हाच वसा आणि वारसा  घेण्याची  प्रतिज्ञा  आज  होळीच्या निमित्ताने घेण्याची गरज  निर्माण झाली आहे. अशी प्रतिज्ञा आपण करु या  आणि आपण पर्यावरण पूरक अशी होळी साजरी करण्यासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भगवान महावीर जयंती

गुढीपाडवा निबंध व माहिती

डॉ.. बाबासाहेब आंबेडकर