डॉ.. बाबासाहेब आंबेडकर
दलितांचे कैवारी,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर होते .ते शिस्तीचे अतिशय भोक्ते होते. त्यांनी भीमरावांना शिस्तीचे धडे दिले. आपल्या मुलांनी शिकावं आणि मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आईचे छत्र लहानपणीच हरपले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव 'भीमराव रामजी आंबेडकर' असे होते. लहानपणापासूनच भिमराव अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी होते. जिज्ञासा वृत्ती ज्ञान पिपासू पणा यामुळे त्यांनी भविष्यात प्रचंड शिक्षण घेतले.
त्याकाळच्या पुराणमतवादी समाजात राहून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जातीभेदाचे वाईट व कटू अनुभव आले. परंतु खचून न जाता त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल खडतर असली तरी जिद्दीने सुरू ठेवली.
बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर ते छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.त्याचाच फायदा घेऊन बाबासाहेबांनी इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन जाऊन उच्च शिक्षण घेतले. त्याठिकाणी अक्षरशः पावाचे तुकडे खाऊन अठरा-अठरा तास अभ्यास करून भीमरावांनी उच्च शिक्षण घेतले. भारतात आल्यानंतर आपल्या अस्पृश्य बांधवांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचा त्यांनी निर्धार केला. दलित बांधव आणि वंचित वर्ग यांचे न्याय हक्क त्यांना मिळालेच पाहिजे. यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाने म्हणजेच आंदोलने, सत्याग्रह, मतपरिवर्तन, जनजागृती यांचा वापर करून आपले ध्येय पूर्ण करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे काम चालू केले.
" शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." महामंत्र त्यांनी अस्पृश्य समाजाला दिला. त्यांची कळकळ व तळमळ पाहून दीनदलित समाज त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभा राहिला. त्या काळात अस्पृश्यांना अतिशय हीन वागणूक दिली जात होती. धर्ममार्तंडांनी समाज गुलामी ठेवला होता त्याला आपले दास बनवले होते. कष्ट करूनही पोटाला अन्न मिळत नव्हते. अंगाला वस्त्र मिळत नव्हते की राहायला डोक्यावर साधे छप्परही नव्हते. ही अवस्था मानव जातीला किंवा कोणत्याही धर्माला शोभणारी नव्हती.
डॉक्टर आंबेडकर ग्रंथप्रेमी होते. त्यांना ग्रंथांचा सहवास नेहमी हवाहवासा वाटे. त्यामुळे त्यांनी शेकडो ग्रंथांचा संग्रह केला होता. माझी सगळी संपत्ती गेली तरी चालेल परंतु या ग्रंथांवर संकट आले तर मी ते निवारण करील असे ते म्हणत. मुंबई येथे राहत्या घरी राजगृह येथे आजही त्यांचा संग्रह जतन करून ठेवला आहे.
डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या या सर्वच महत्त्वाच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या असे लक्षात आले की मनुस्मृती सारखा ग्रंथ सामान्य माणसाला कायमच दास्यत्वात ठेवणारा ग्रंथ असून जोपर्यंत धर्म या ग्रंथानुसार चालेल तोपर्यंत आपले मानवी हक्क आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून त्या विचारांना मांडणारा, समर्थन करणारा मनुस्मृति ग्रंथ त्यांनी दहन केला.
सरकारने अस्पृश्यांना सर्वत्र पाण्यासाठीचा हक्क दिला असून सुद्धा महाड सारख्या ठिकाणी तो त्यांना मिळत नव्हता. म्हणून त्या ठिकाणी जाऊन 2 मार्च 1920 रोजी तिथल्या चवदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. त्या ठिकाणी खूप संघर्ष झाला. प्रकरण न्यायालयात गेले. दलितांच्या बाजूने न्याय मिळाला. शेवटी दलितांना त्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळाला.
महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर आंबेडकरांनी आपला मोर्चा नाशिक येथील काळाराम मंदिराकडे वळविला.या मंदिराच्या कळसाचे दुरून दर्शन घ्यावे लागत असे. परंतु गाभार्यात प्रवेश नव्हता.परमेश्वराने सर्व माणसांना आपले लेकरे मानली. मग दलितांना त्याचे दर्शन घ्यायला बंदी का ? आमच्या स्पर्शाने देवाला विटाळ होतो हे आम्हाला मान्य नाही. म्हणून हजारो दलितांच्या उपस्थितीत काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. दलितांना न्याय मिळाला.
मूकनायक व बहिष्कृत भारत यांसारखी वर्तमानपत्रे सुरू करून बाबासाहेबांनी समाज प्रबोधनाचे बहुमोल कार्य केले आपल्या समाज बांधवांना सतत मदत आणि मार्गदर्शन त्यांनी सातत्याने सुरूच ठेवले. समाजबांधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. शाळा काढल्या. कॉलेजे सुरू केली.
भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आले त्यावेळी देशाचा कारभार कसा चालला पाहिजे यासाठी राज्यघटना निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली. घटना समितीच्या निर्मितीनंतर त्यामध्ये येईल मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आले. डॉक्टर बाबासाहेबांनी देशोदेशींच्या राज्यघटनांचा आणि कायद्यांचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केलेला होता. त्यांचे ज्ञान आणि कायद्याचा अफाट व्यासंग पाहून त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले होते. बाबासाहेबांनी आपले सर्व ज्ञान पणाला लावून रात्रीचा दिवस करून, अतिशय कष्ट करून, स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अमलात आली. डॉ. बाबासाहेबांचे योगदान मध्ये प्रचंड होते. राज्यघटना देण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा प्रचंड कालावधी लागला. एकूण तीनशे पंधरा कलमे आणि परिशिष्टे मिळून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना, भारताची राज्य घटना ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कार्य म्हणजे हिमालयाएवढे प्रचंड कार्य होते. त्यामुळे बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणूनही डॉ. आंबेडकर यांना स्थान मिळाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभरात त्यांच्या पत्नीने रमाईने फार मोठी साथ दिली. मोलमजुरी करून त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी पैसे दिले. कोणत्याही कामामध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा कधीच आड येऊ दिल्या नाहीत. धन्य ती रमाई माऊली जिने आपल्या पतीसह लाखो भारतीय दिन दलितांचा संसार उभा केला.
हिंदू धर्मातील प्रथा परंपरा आणि पुराणमतवादी लोक यांना कंटाळून बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन करण्याचे ठरवले. ''हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही" हे त्यांनी जाहीर केले. बाबासाहेबांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले होते.
गौतम बुद्धांनी मांडलेली प्रज्ञा,शील आणि करुणा ती तत्वे बाबासाहेबांना अतिशय आवडत. बुद्धाचा मार्ग हा मानवतावादी धर्माचा मार्ग आहे हे त्यांना मनोमन पटले होते. त्यामुळे नागपूर येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि धम्मचक्र परिवर्तन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जलनीतीकार होते. तथापि त्याही पलीकडे जाऊन ते मानवता धर्माचे महान उपासक आणि आधुनिक काळातील उदगाते होते यात शंकाच नाही.
बाबासाहेब अफाट कष्ट व संघर्ष करून थकले होते. शेवटी 6 डिसेंबर 1956 रोजी ते पंचतत्वात विलीन झाले. या थकल्या-भागल्या महामानवाला शेवटचे अभिवादन करण्यासाठी लाखो लोकांचा जनसागर जमा झाला होता. अतिशय दुःखी अंतकरणाने लोक रडत होते. अतिशय दुःख लोकांना झाले होते. आपल्या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी म्हणून अखेरचा निरोप दिला.
पुढे 1990 साली भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. इथेसुद्धा बाबासाहेबांवर प्रचंड आनंद झाला. कारण स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार अगदी सुरुवातीलाच मिळायला हवा होता. परंतु त्यासाठी 1990 उजाडावे लागले.
येणाऱ्या पुढील पिढ्या या महामानवाला राज्य घटनेच्या शिल्पकाराला आणि त्यांच्या कार्याला आचंद्रसूर्य विसरणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा